
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला.
यावेळी महायुतीच्यावतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनांमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे तालुका आणि शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महायुतीच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, दहशतवाद्यांना कठोर शासन करावे आणि त्यांच्या संघटनांना संपवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. हिंदू पर्यटकांवरील हा हल्ला केवळ एका विशिष्ट समुदायावर नसून संपूर्ण देशावरील हल्ला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांची जबर किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला मागील सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मागणी केली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे, तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी व दिनेश फटांगरे, तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे दिनेश सोमाणी, राम जाजू, राजेंद्र सांगळे, दादा गुंजाळ, साहेबराव वलवे, रोहिदास साबळे, वाल्मिक शिंदे, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, भारत गवळी, वैभव लांडगे, नीलम खताळ, कांचन ढोरे, सुरेखा खरे, अंजना भालसिंग, रुपाली उंडे, दिपाली वाव्हळ, दिलीप रावळ, पांडू शेराल, रवी उडता, रोहित चौधरी, वरद बागुल, भगवान गीते, शशांक नामन, विनायक तांबे, संदेश देशमुख, अक्षय वर्पे, भैय्या सातपुते, कल्पेश पोगुल, सुदर्शन इटप, विशाल एनगंदूल, शिवाजी घोडेकर, प्रवीण कर्पे, जग्गु शिंदे, विकास जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


