महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या दणदणीत विजयानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विधानसभेच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. “विधानसभेच्या निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. अतिआत्मविश्वास आणि गाफीलपणा टाळल्यामुळेच हा विजय शक्य झाला,” असे थोरात म्हणाले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे, या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा स्नेह मेळावा गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह नूतन संचालक, अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांपासून निवडणुकीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात होत्या, परंतु सभासदांनी शेतकरी विकास मंडळावर विश्वास ठेवला, असे थोरात यांनी सांगितले. “राजकारण काहीही असले तरी, कारखाना शेतकरी विकास मंडळाकडेच असावा, यावर सर्वांचे एकमत होते. कारखाना जवळपास बिनविरोध झाला असून, कार्यकर्त्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली, असे थोरात यांनी सांगितले. “हत्ती गेला आणि शेपूट राहिले आहे, अकोले तालुक्यातील आणि धांदरफळ मधील एकेका जागेचा असलेला तिढा लवकरच मार्गी लागेल,” असे ते म्हणाले.
थोरात यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत, “विरोधकांनी काहीही सांगितले तरी, सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही,” असे सांगितले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे थोरात यांनी सांगितले. “मी आमदार झालो नाही, याचा मला फारसा फरक पडला नाही, परंतु तालुक्याच्या विकासावर त्याचा काय परिणाम झाला, याचा विचार करणे आवश्यक आहे. आपण नेमके कुठे कमी पडलो, याचा विचार करणे गरजेचे आहे,” असे थोरात म्हणाले.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला – सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. “ज्या ठिकाणी सहकारी कारखाने बंद पडले आहेत, तेथील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे जाऊन बघा. आपण संघर्षातून मिळवलेले यश जपले पाहिजे.” साखर उद्योगात बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, “स्पर्धेत टिकण्यासाठी एकरी उसाचे उत्पादन वाढवणे आणि दूध उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याची कार्यक्षमता वाढवावी लागेल,” असे थोरात म्हणाले.
पहेलगाम हल्ल्याचा निषेध करत, थोरात म्हणाले, “हा हल्ला मानवतेला काळीमा फासणारा आहे. अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांवर हल्ला केला, याचा मी निषेध करतो.”
सुधीर तांबेंनी सहकार क्षेत्रातील राजकारणावर टीका केली
माजी आमदार सुधीर तांबे यांनी संगमनेरच्या सहकार क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले आणि सहकार राजकारणाचे माध्यम होऊ नये, असे मत व्यक्त केले. समाजात द्वेष भावना पसरवणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतींचा वापर करणाऱ्या राजकारणावर त्यांनी टीका केली.



