संगमनेर – प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 23) तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर कॅण्डल मार्च काढण्यात आला, कॅण्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘अतिरेक्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘फाशी द्या फाशी द्या अतिरेक्यांना फाशी द्या’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘नही झुके नही झुकेंगे’ अशा घोषणांनी वातावरण संतप्त केले होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “अतिरेक्यांनी केलेला हा हल्ला अत्यंत भ्याड आणि निंदनीय आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी आत कसे आले, हा गंभीर प्रश्न आहे. या आतंकवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आतंकवाद ही जगाला लागलेली कीड आहे आणि ती संपवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढायला हवे. जातिभेद आणि कट्टरतावाद हे मानवजातीसाठी धोकादायक आहेत आणि या हल्ल्याचा संगमनेरमधील प्रत्येक नागरिक निषेध करतो आहे.”

डॉ. जयश्री थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. सामान्य माणूस आपल्या कमाईतील थोडे थोडे पैसे जमा करून काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न पाहतो आणि अशा आतंकवादी हल्ल्यांमुळे त्यांचे जीवन संपते, हे अत्यंत चिंताजनक आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व जाती-धर्म आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
आता भारतीय नागरिक म्हणून एक होण्याची वेळ आली आहे. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या २७ निष्पाप नागरिकांचा काय दोष होता? यात महाराष्ट्रातील सहा लोकांचा समावेश आहे. सरकारने या अतिरेक्यांना पकडून मृत्युदंड देऊन या हल्ल्याचा बदला घ्यावा.”
मार्चमध्ये संगमनेर शहर आणि युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, किशोर टोकसे, गणेश मादास, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, शैलेश कलंत्री, प्रा. बाबा खरात, गणपतराव सांगळे, जीवन पंचारिया, राणीप्रसाद मुंदडा, अंकुश ताजणे, रमेश नेहे, सुरेश झावरे, वैष्णव मूर्तडक, डॉ. विजय पवार, प्रीतम साबळे, सोमनाथ गुंजाळ, सचिन खेमनर, सुरभी मोरे, अभय खोजे, प्रदीप हासे, किरण रोहम, अमित गुंजाळ, दीपक शिंदे, किशोर बोऱ्हाडे, आदित्य बर्गे, अलोक बर्डे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी विश्वास मुर्तडक आणि प्रा. बाबा खरात यांनीही पाकिस्तानच्या धोरणांवर टीका केली.



