महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संगमनेर शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (२३ एप्रिल) सायंकाळी तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी बोलताना, पूर्वी काँग्रेसच्या काळात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनता वैतागली होती, त्यामुळे त्यांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, भाजपच्या काळातही पुलवामा आणि पहलगामसारखे हल्ले होत असतील, तर जनतेला भाजपलाही घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले.
शहरप्रमुख पप्पू कानकाटे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. अजीज मोमीन आणि आसिफ तांबोळी यांनी देखील देशातील सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली. तर अशोक सातपुते, शितल हासे यांची देखील भाषणे झाली.

आंदोलनात माजी शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, प्रभारी शहराध्यक्ष पप्पू कानकाटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, वैशाली वडतल्ले, संभव लोढा, सदाशिव हासे, अजीज मोमीन, इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, आसिफ तांबोळी, राजू सातपुते, विजय सातपुते, अमोल डुकरे, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, राहणे साहेब, प्रकाश गायकवाड, अमित फटांगरे यांच्यासह एसटी कामगार सेनेचे आणि रिक्षा सेनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.



