
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या जिहादी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरात शनिवारी, (२६ एप्रिल) भव्य तिरंगा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजासह शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
पहलगाम येथे झालेल्या अमानुष हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना धर्म विचारून, त्यांना कलमा वाचायला लावून त्यांचे कपडे उतरवून विटंबना केली. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देशविघातक शक्तींना कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी संगमनेरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या तिरंगा मोर्चाचे आयोजन केले आहे.

हा मोर्चा शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता स्वातंत्र्य चौकातून निघेल. त्यानंतर अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्टँड आणि नवीन नगर रोडमार्गे प्रांत कार्यालयावर पोहोचेल.
आयोजकांनी संगमनेर शहरातील सर्व देशभक्त नागरिकांना या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या शहीद बांधवांना आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


