महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्या कार्यकाळात उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील १८२ गावांसाठी वरदान ठरलेले निळवंडे धरण आणि त्याचे उजवा व डावा कालवे पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज रखरखत्या उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी आहेत. परिणामी लाभक्षेत्रातील पाण्याचे टँकरही कमी झाले आहे. थोरात यांच्या दूरदृष्टीमुळेच धरणाच्या लाभक्षेत्रात आज समाधानाचे सुखद वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी व सिन्नर या तालुक्यातील एकूण १८२ गावांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. ९७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यामुळे २ हजार ३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, तर ८५ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यामुळे ४३ हजार ८६५ हेक्टर जमिनीला फायदा होत आहे.
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाला माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १९९९ मध्ये पाटबंधारे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने चालना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा काढून त्यांनी धरणाच्या भिंतीचे काम सुरू केले. अनेक अडचणी असतानाही प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून समन्वय साधत थोरात यांनी त्यांना संगमनेर व अकोले तालुक्यात जमिनी उपलब्ध करून दिल्या. धरणाचे काम पूर्ण झाल्यावर डाव्या व उजव्या कालव्यांची कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, २०१४ ते २०१९ या काळात कालव्यांच्या कामाची गती मंदावली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर कोरोनाच्या संकटातही कालव्यांची कामे सुरू ठेवण्यात आली.
थोरात यांनी कोरोनाच्या काळातही सतत पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेले. त्यांनी स्वतः वारंवार जाऊन कामाची पाहणी केली. मे २०२३ मध्ये या कालव्यातून प्रथमच पाणी आले आणि दुष्काळी गावांमध्ये आनंदाची लाट पसरली. जुलै २०२४ मध्येही डाव्या व उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी मिळाले. सध्या उष्णतेची तीव्रता वाढत असतानाही, थोरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे.
शेतकऱ्यांची कृतज्ञता… उन्हाळ्यामध्ये दोन्ही कालव्यांमधून निळवंडे धरणाचे पाणी मिळाल्याने उजवा व डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शेतकऱ्यांनी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कालव्यातून आलेले पाणी हे थोरात साहेबांमुळे… निळवंडेचे पाणी आमच्या गावातून येणार हे आम्हाला माहीत होते आणि यासाठी थोरात साहेब काम करत होते. ते नेहमी शेतकऱ्यांना सांगायचे की पाणी देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आम्हाला डाव्या कालव्यातून तीन वेळा पाणी मिळाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाले. आज उन्हाळ्यातही आमच्या शेतात पाणी आले आहे, ते फक्त थोरात साहेबांच्या कष्टामुळेच शक्य झाले आहे. – जनाबाई सोनवणे, शेतकरी महिला, वेल्हाळे.
दोन्ही कालव्यांचे काम हे थोरात साहेबांमुळे… दुष्काळी भागात निळवंडेचे पाणी मिळावे यासाठी बाळासाहेब थोरात यांनी डावा व उजवा कालवा पूर्ण केला. कोरोना संकटात त्यांनी सांगितले की दोन्ही कालव्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करून दोघांनाही एकाच वेळी पाणी सोडण्यात येईल. दोन्ही कालवे एकाच वेळी पूर्ण झाल्याने आमच्या उजव्या कालव्याला सुद्धा डाव्या कालव्याबरोबरच पाणी मिळाले. उन्हाळ्यामध्ये निळवंडेचे पाणी थेट शेतात मिळत असल्याचा आनंद आहे आणि हे सर्व काम थोरात साहेबांचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे. – प्रवीण थोरात, शेतकरी, पानोडी.
लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत त्याच्या हक्काचे पाणी पोहोचवण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून, त्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला होता. या पुढील काळात देखील लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना निळवंडेचे पाणी मिळावे यासाठी आपण सतत पाठपुरावा करणार आहोत. – बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा निळवंडे धरणाचे निर्माते.



