महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे
महाराष्ट्र राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, पुणे येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळे’त बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ग्रामविकास विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची काळजी घ्यावी.”
प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. “उत्तम प्रशासनासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा. तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा. इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचा अवलंब करावा,” असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीज उपलब्ध करून द्यायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात ग्रामविकास विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे सांगत क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे शक्य झाले आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढेल.
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली असून, आगामी 5 वर्षांमध्ये नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक 5 किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावे लागतील. शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘लखपती दीदी’सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ग्रामविकास विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाईड पोर्टल, आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण, 20 जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित पुस्तिकेचे आणि महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव, यशदाचे महासंचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


