महाराष्ट्र संवाद न्यूज – आश्वी
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) सायंकाळी मोठ्या उत्साहात झाले. याप्रसंगी बोलताना डॉ. विखे यांनी उंबरी बाळापूर ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले आणि छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

डॉ. विखे पाटील म्हणाले, उंबरी बाळापूरमधील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार झाले आहे. विशेष म्हणजे, हे स्मारक उभारणीत गावातील १५ ते ८० वर्षांपर्यंतच्या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सक्रिय योगदान दिले आहे. महाराजांच्या आगमनाने गावाची शोभा वाढली आहे. गावात काही अंतर्गत वाद होते, परंतु त्यातून मार्ग काढत विखे पाटील कुटुंबाला हे पुण्य आणि जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, ते आपल्या सर्वांचे दैवत आहेत आणि त्यांच्या विचारानुसारच बहुजन समाजाला एकत्र घेऊन गावाला विकासाच्या दिशेने नेले जाईल. हा कार्यक्रम कोणत्याही एका पक्षाचा नसून, यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसारख्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो, तेव्हा जात, धर्म आणि पक्ष आडवे येत नाहीत, हे उंबरी बाळापूरच्या ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखवले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यानंतर कोल्हार आणि शिर्डी येथेही भव्य शिवसृष्टी साकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. तसेच, हा कार्यक्रम पक्षीय नसला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतील, त्याला गावकऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले, ज्याला उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ घोषाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुतळा उभारणीदरम्यान गावात झालेल्या अंतर्गत वादावर भाष्य करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “गाव जर ठराविक रक्कम देऊन शांत होत असेल, तर आमच्या पैशाची किंमत काहीच नाही. आमच्यासाठी कार्यकर्त्यांची किंमत अधिक आहे. त्यामुळे गाव शांत राहावे, याच भूमिकेतून हे काम केले.” भविष्यात उंबरी बाळापूर गावातील इतर सर्व प्रश्नही ताकदीने सोडवून कोणतेही काम प्रलंबित ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.


