महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर शहरात हनुमान जयंती रथोत्सवादरम्यान उसळलेल्या दोन गटांतील वादामुळे ऐतिहासिक मिरवणुकीला गालबोट लागले होते. या घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी शहर पोलिसांनी काही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आता, या प्रकरणी पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत घटनेच्या पंधरा दिवसांनंतर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शहरातील दोन वकिलांसह एकूण दहा जणांचा समावेश आहे, यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

१२ एप्रिल रोजी झालेल्या हनुमान जयंतीच्या रथोत्सवात पोलीस आणि जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीत वाद निर्माण झाला होता. यानंतर, रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विश्वनाथ भालेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध प्रथम गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर मधुकर सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहूलकर आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता.
दरम्यान, दुसऱ्या गटातील मारहाण झालेल्या तरुणाची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचा आरोप करत, खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि संगमनेरातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी शहरातील युवकांनी रस्त्यावर उतरून मंगळवारी (२२ एप्रिल) महामोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यावेळी पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता. आता, या घटनेनंतर तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांनी ललित शरद शिंपी (रा. अच्युतनगर, संगमनेर) यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे.

ललित शिंपी याच्या फिर्यादीनुसार, कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगराज कुंदनसिंह परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात, हर्ष श्यामसुंदर जोशी, श्यामसुंदर रामेश्वर जोशी, गिरीश राजेंद्र मेंद्रे, श्रीराम अरविंद गणपुले, भगवान तुकाराम गीते आणि शुभम चंद्रकांत लहामगे या दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९ (१), १८९ (२), १९१ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपींमध्ये शहरातील दोन वकिलांचाही समावेश आहे, यामुळे या प्रकरणाची कायदेशीर बाजू अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.
ललित शिंपी यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ११ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ते त्यांचा मित्र ललित परदेशी (रा. मोची गल्ली, सय्यदबाबा चौक, संगमनेर) यांच्यासोबत हनुमान जयंतीनिमित्त आयोजित सलामी वादन पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगराज कुंदनसिंग परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात आणि हर्ष शामसुंदर जोशी हे तिथे उपस्थित होते. कमलाकर भालेकर यांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ करत, “येथे का आला आहेस, आम्ही चंद्रशेखर चौकाचे बाप आहोत, तू येथून निघून जा नाहीतर तुला पाहून घेईल,” अशी धमकी दिली. त्यामुळे कोणताही वाद नको म्हणून फिर्यादी तेथून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी, १२ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी त्यांचा मित्र गणेश भांगे, नितीन जाधव आणि अक्षय दाणी यांच्यासह मारुती दर्शन आणि रथोत्सवासाठी चंद्रशेखर चौकात आले होते. त्यावेळी योगराज परदेशी यांनी त्यांच्याजवळ येत, “तुम्हाला काल रात्रीच येथे येऊ नका म्हणून सांगितले होते, तरी तुम्ही येथे का आलात,” असे म्हणून शिवीगाळ केली. फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना, तिथे आलेल्या कमलाकर भालेकर यांच्यासह अन्य आरोपींनी शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली.
फिर्यादीने आपण गाव मारुतीच्या दर्शनाला आल्याचे सांगितले, परंतु आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हर्ष जोशी याने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन खेचून तोडली. मारहाणीचा प्रतिकार करणे शक्य नसल्याने दर्शनासाठी आलेल्या लोकांनी मध्यस्थी करून त्यांना सोडवले. तक्रार केल्यास घर पेटवून देण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील करत आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यामुळे हनुमान जयंती रथोत्सवातील वादाला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


