महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
“संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये पठारभागातील कार्यकर्त्यांनी मला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. मग ते साखर कारखाना असो, दूध संघ, शेतकी संघ, जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा बँक; या प्रत्येक संस्थेत मला मिळालेले सहकार्य मी कधीही विसरू शकत नाही,” असे उद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
आंबीखालसा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व युवक हितचिंतकांसाठी एका स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक पांडुरंग घुले, लक्ष्मण पावडे, सभापती शंकर खेमनर, अजय फटांगरे, बबन कुर्हाडे, अरूण वाघ, विजय राहणे, सुरेश कान्होरे, दादापाटील आहेर, राजेंद्र आहेर, गणेश सुपेकर, दत्तात्रय गडगे, बापू जाधव, संपत आभाळे, ज्ञानदेव गडगे, सुनंदाताई भागवत, प्रियंका गडगे, भाग्यश्री नरवडे, प्रमोद कुरकुटे, दिनेश पावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सहकार चळवळ केवळ उद्योगांची साखळी नाही, तर ती शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. जेव्हा साखर कारखान्यामुळे किंवा दूध संघामुळे खेड्यापाड्यात प्रगती झाली, तेव्हा त्यामागे लोकांचे महत्त्वपूर्ण योगदान स्पष्टपणे दिसून येते.

आजच्या तरुण पिढीला सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे, त्याचे प्रेरणास्थान म्हणजे जुन्या पिढीने घालून दिलेली परंपरा. मधल्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना असे वाटले होते की आता साखर कारखान्याचे काय होईल, अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या. परंतु, अशा कठीण परिस्थितीतही आपण सर्वांनी एकजूट दाखवत कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. हे काम सोपे नव्हते, पण आपण ते करून दाखवले. अनेक हितचिंतकांनी मोठे मन करून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. याचा त्रास मलाही झाला, पण आता आपण अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केली आहे, असेही ते म्हणाले.
राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्थितीचा उल्लेख करत थोरात म्हणाले, आपल्या संगमनेरची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि हे सर्व चक्र या कारखान्यामुळेच फिरते. आतापर्यंत आपण घेतलेल्या अचूक आणि योग्य निर्णयामुळेच आपली प्रगती झाली आहे. बाहेरच्या शेतकऱ्यांचाही आपल्यावर विश्वास आहे, म्हणूनच आपण त्यांचा ऊस खरेदी करत आहोत. कारण त्या शेतकऱ्यांचा विश्वास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता ऊस उत्पादक शेतकरी एकरी शंभर टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देणे शक्य होईल आणि बाहेरून ऊस आणण्याची गरज भासणार नाही.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजय फटांगरे यांनी प्रास्ताविक केले, बाळासाहेब कुऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले आणि वकील सुहास आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


