
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर:
महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी, (१ मे २०२५) सकाळी ८ ते १२ या वेळेत नवीन नगर रोड येथे ‘समतेची मिसळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना घेऊन सर्वधर्मीय आणि सर्व समाजाच्या सहकार्यातून हा उपक्रम होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून, लोककल्याण आणि समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका एक कुटुंब म्हणून ओळखला जातो आणि याच बंधुभावाला अधिक दृढ करण्यासाठी हा ‘समतेची मिसळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात तालुका आणि शहरातील सर्व धर्मीय व सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन मिसळ बनवण्यासाठी योगदान देणार आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमातून समता आणि बंधुभाव वाढावा, हा युवक काँग्रेसचा उद्देश आहे. तरी, संगमनेर शहरातील सर्व नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


