महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर:
संगमनेर तालुक्याने पुन्हा एकदा विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने अटल भूजल योजनेअंतर्गत आयोजित ‘भूजल समृद्ध ग्राम’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल गावाला तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या खांडगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी देखील ‘माझी वसुंधरा ४.०’ अभियानात राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. त्यावेळी गावाने लोकसहभागातुन पृथ्वीच्या पाच पंचतत्वांवर काम केले, आता २०२३-२०२४ या वर्षात भूजल संवर्धनाच्या क्षेत्रात मिळालेले हे दुसरे मोठे यश गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक आहे. नुकतीच या पुरस्कारांची यादी जाहीर झाली असून, यात अहिल्यानगर जिल्ह्यातून खांडगावने बाजी मारली आहे.
या यशामागे सरपंच ॲड. विकास गुंजाळ, माजी सरपंच व श्यांप्रोचे संचालक सोमनाथ गुंजाळ, उपसरपंच सुनील रुपवते यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी उज्वला नवले व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे समर्पित प्रयत्न व कुशल नेतृत्व कारणीभूत ठरले आहेत. या सर्वांनी गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट काम केले.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना युवा सरपंच ॲड. विकास गुंजाळ म्हणाले, “आम्ही कधीही पदाचा केवळ दिखावा न करता, लोकांच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी काम करण्यावर भर दिला. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून निवडून दिल्यानंतर, त्यांच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. एकजूट आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवून केलेल्या कामामुळेच आम्हाला हे यश मिळाले आहे.”

पुरस्काराच्या माध्यमातून मिळणारी ५० लाख रुपयांची रक्कम भूजल व्यवस्थापनाच्या कामांसाठी वापरली जाणार आहे. त्यातून गावाच्या भुजल पातळीत वाढ होऊन गावचा सर्वागीन विकास होईल व गाव समृद्धी च्या दिशेने वाटचाल करेल यासोबतच, खांडगावची आता राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे, हे आणखी एक अभिमानास्पद बाब आहे. या दोन्ही पुरस्कारांच्या माध्यमातून गावाने एक वर्षात एकूण एक कोटी रुपयांची बक्षिसे मिळवली आहेत, असेच ग्रामपंचायत मार्फत अनेक लोक उपयोगी कामे केली तर खांडगावचे नाव भविष्यात महाराष्ट्राभर झळकेल असेही त्यांनी सांगितले. माजी सरपंच सोमनाथ गुंजाळ व यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व अनुभव हे या यशात महत्त्वाचे आहे, असे मत ॲड. विकास गुंजाळ यांनी व्यक्त केले.
एकंदरीत, खांडगाव ग्रामपंचायतीने भूजल संवर्धनाच्या क्षेत्रात केलेले हे कार्य इतर गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. लोकसहभाग आणि योग्य नेतृत्वाच्या बळावर विकास आणि पर्यावरण संरक्षण एकाच वेळी साधता येते, हे खांडगावने सिद्ध करून दाखवले आहे.

