महाराष्ट्र संवाद न्यूज – सुरत (गुजरात):
महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गुजरात राज्यातील १२ लोकसभा मतदारसंघांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुरत येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ‘संघटन सृजन अभियाना’च्या माध्यमातून संविधान रक्षणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री भरतसिंग सोळंकी, माजी खासदार किशनभाई पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष परिमल राणा, सुरत शहर काँग्रेस अध्यक्ष धनसुख राजपूत, कार्यकारी अध्यक्ष विपुल उदानवाला, दिनेश सावळिया आणि मीडिया समन्वयक कल्पेश बारोट यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्र उभारणीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. आज लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संघटन सृजन अभियान’ राबवून गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा आमचा निर्धार आहे.”

बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील एक अनुभवी आणि निष्ठावान नेते आहेत. त्यांनी संगमनेर मतदारसंघातून आठ वेळा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शिक्षण, जलसंधारण आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. यापूर्वीही त्यांनी गुजरात निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच त्यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. आता गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि पक्ष संघटना मजबूत करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
या बैठकीत गुजरात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, महिला आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्ष आगामी काळात अधिक ताकदीने संघर्ष करेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.


