
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
पुणे-नाशिक महामार्गावर घारगावजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत गोमांसाची वाहतूक करणारी एक अलिशान कार पकडली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28 एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघा आरोपींविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती की संगमनेरहून पुणेच्या दिशेने एका अलिशान कारमधून गोमांसाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ कार्यवाही करत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर आणि सुभाष बोडखे यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

या पथकाने पंचांना सोबत घेऊन पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला असलेल्या मुळा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला. काही वेळानंतर, संगमनेरच्या बाजूने पुण्याकडे एक इकोस्पोर्ट कार (क्रमांक एमएच.01, बीके.3545) येताना दिसली. कारमध्ये समोरच्या सीटवर दोन व्यक्ती बसलेल्या असल्याचे पोलिसांना दिसले. संशय आल्यानंतर पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला.
चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये काय आहे, अशी विचारणा केली. मात्र, चालकाने समाधानकारक उत्तरे न देता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष कारची तपासणी केली असता, मागील सीट काढून टाकलेली आणि काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कागदात मोठ्या प्रमाणात गोमांस भरलेले आढळून आले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार फिरोज सिकंदर शेख (वय 37) आणि अयाज पापामिया मोमीन (वय 32, दोघेही रा. अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे अंदाजे 700 किलो गोमांस आणि 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संगमनेर मधील अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे… दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या एका बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्या पाठोपाठ, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना संगमनेर मधील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे निर्देश देताना कोणालाही पाठीशी न घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. खताळ यांच्या आदेशाला काही तास उलटत नाही तोच संगमनेरमधील अवैध धंदे आणि कत्तलखाने सुरूच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायांना नेमके पाठबळ कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



