महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कारखान्याच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

विखे म्हणाले, “२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. तरीही, नव्याने चौकशी झाल्यास आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत.”
कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या आरोपांवर विखेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सन २००४ मधील हे प्रकरण विरोधकांनी २०१४ मध्ये उकरून काढले. या प्रकरणी स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या चौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल स्वीकारून, २०१९ मध्ये कोणताही फौजदारी गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे.”

विखेंनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, “महायुतीचे यश अनेकांना बघवत नाही. व्यक्तिद्वेषापोटी मला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. निवडणुकीत वातावरण निर्माण करून आरोप करणे, ही त्यांची सवय आहे. या प्रकरणात त्यांचा ‘बोलविता धनी’ कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत सभासदांना सामोरे न जाता, आता हे आरोप करणे म्हणजे जनतेचा विश्वास गमावल्याचे लक्षण आहे.”
विखेंनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२५ मध्ये दिलेल्या आदेशात कारखाना व्यवस्थापन व इतरांविरुद्ध त्रास होईल अशी कोणतीही जबरदस्तीची कारवाई करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व शंकांचे निरसन झाले आहे.


