पहेलगाममध्ये गेल्या मंगळवारी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक राजकारणाने घेतलेली पातळी अत्यंत घातक आणि देशाला खड्डयात घालणारी ठरू लागल्याने सारीच अस्वस्थता आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे दाखवून देण्यासाठी जे काही करायला हवं त्याऐवजी नको ते करण्याचा हट्ट सध्या केंद्रातल्या सरकारकडून आणि भाजप प्रणित राज्य सरकारांकडून अवलंबला जातो आहे. मुस्लिमांशिवाय काश्मीर आणि भारत अशी मानसिकता या मंडळींची आहे. पंतप्रधान मोदी यांचं त्यांना खतपाणी आहे. मोदी सरकार केंद्रात अस्तित्वात आल्यापासून मुस्लिमांविषयी ओकली जाणारी आग, त्या धर्मातील बांधवांना ज्या प्रकारे एकाकी पाडलं जातं, मॉब लिंचिंग सारख्या घटनांमधून मुस्लिमांना गाठून ठेचणं, त्यांच्या दुकानांवर बहिष्कार घालणं असे असंविधानिक प्रकार वरच्यावर देशात घडत आहेत. हा भारतात दुहीची बिजं पेरण्याचाच प्रकार होय. जाहीर सभांमधून निधर्माच्या आणाभागा मारायच्या आणि प्रत्यक्षात धार्मिक तेढ निर्माण करणार्यांची पाठ थोपटायची असले उद्योग गेल्या काही वर्षांपासून अविरत सुरू आहेत. एनआरसीविरोधी आंदोलन करणार्यांना सात वर्षं डांबून ठेवण्याचा विषय असो की जेएनयूमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन असो. या आंदोलकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबताना सरकार पक्षाला काहीच वाटलं नाही. मॉबचिलिंगच्या घटनांनी तर सारा देश हादरून गेला. पण हे घडवणार्यांना पाझर फुटला नाही. ज्यांनी हे रोखायचं तेच त्यांना प्रोत्साहित करत असतील तर देशातील धार्मिक तेढ रोखण्याच्या अपेक्षा कशा करणार?
अशा या घटनांना नजरेपुढे ठेवत असताना गेल्या आठवड्यात पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला नसल्यास नवलच. दहशतवाद्यांना नसते जात ना धर्म, असं म्हणणारेही सार्या मुस्लिमांना दहशतवाद्यांचे पाठिराखे म्हणून शिक्का मारून मोकळे होतात. कधी नव्हे त्या कश्मीरी जनतेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. लालचौकसारख्या संवेदनशील ठिकाणीही निषेध करायला लोकं बाहेर पडली. दहशतवाद्यांचा असा निषेध काश्मीरमध्ये कधी झाला नाही. याला सत्तेच्या पक्षाला काही महत्व नव्हतं. काश्मीरमधील मुस्लिमांना टार्गेट करण्याचे उद्योग थांबले नाहीत. सत्ताधारी पक्षाशी संबंधित आणि हिंदूत्ववादी संघटनांनी सुप्तपणे हाती घेतलेल्या मुस्लिमविरोधी भूमिकेने सारा देशात अराजक परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. काश्मीरला भेट दिलेल्या हल्ल्यात सापडलेल्या हरएक नागरिकाने तिथल्या जनतेच्या अपुलकीविषयी आणि आपलेपणाविषयीचं भरभरून कौतुक केलं. मात्र याचा काहीएक परिणाम ट्रोलरवर होत नव्हता. धर्माची ओळख सांगणारे गट मुस्लिमांमधील आपलेपणालाच ठोकरून लावत असल्याचं उघड दिसत आहे. सरकारचा नाकर्तेपणा आणि दुर्लक्षपणामुळेच दहशतवादी कारवायांमध्ये 26 जणांचा बळी गेला, हे उघड सत्य असताना यातील त्रुटींवर बोट ठेवण्याऐवजी सरकारी पक्षाचे नेते, कार्यकर्ते उघडपणे धार्मिक ध्रुवीकरणाला फोडणी देत आहेत. 
याने देशात तेढ निर्माण होऊन नको ते संकट डोकं वर काढत असल्याची हाक पुण्यातील वीरमाता कविता गाडगीळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळवली आहे. हे पत्र म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणाचा पंचनामाच होय. पत्र पाठवल्यापासून गाडगीळ यांना भक्त मंडळींकडून ज्या प्रकारे ट्रोल केलं जातंय ते पाहाता धर्माचा बुरखा घातलेले किती विकृत आहेत, याची जाणीव होते. मीग 21 या लढाऊ विमानाच्या अपघातात धारातिर्थी पडलेले फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ यांच्या कविता या मातोश्री. एकीकडे 1972 च्या बांगलादेश युध्दात त्यांनी आपल्या वायू दलातील पायलट असलेल्या पती अनील गाडगीळ यांना गमावलं असताना ज्या मातेचा मुलगाही देशासाठी प्राणाची आहुती देतो, अशा वीर मातेने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राची खरं तर सार्यांनीच दखल घेणं आवश्यक होतं. ‘जिवंत देशवासीयांचं भविष्य पणाला लावू नका’, असं आवाहन करताच विकृत धार्मिक बांडगुळांनी कविता यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. आज अभिजित हे 51 व्या वर्षांचे असते. मिग-21 च्या उड्डाणानंतर 33 व्या सेकंदात अपघात झाला आणि अभिजित धारातीर्थी पडले.
अभिजित यांच्या या आठवणी कोणाच्याही वाट्याला येऊ नये, याकरिता पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांनी मानवतेला हाक दिली आहे. मात्र तेव्हापासून विकृतांच्या ट्रोलिंगच्या त्या बळी ठरल्या आहेत. कोणत्याही हिंसेत स्थब्धता असते, ती दगडात आणि हाडात भिनते. जी स्थब्धता अशांत असते. अशा स्थब्धतेला युध्द हा पर्याय असूच शकत नाही. युध्द म्हणजे विध्वंस. ते गरीबांकडून बलिदान मागतं. शेतकरी, कामगार, सरकारी नोकर आणि शिक्षकांची मुलंच युध्दाचे खरे बळी ठरतात. श्रीमंतांची मुलं वणव्यात आणि चिखलात जात नसतात. युध्द हे त्यांच्या पाचवीचा भाग नसतो. अशावेळी आपल्या देशाला गरज कसली आहे, याची जाणीव कविता यांनी पंतप्रधानांना करून दिली आहे.

युध्दाची गरज पाकिस्तानला आहे. कारण ते राष्ट्र संपुष्टाच्या वाटेवर आहे. युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली की त्यांना अणुबॉम्बची आठवण होते. हा प्रयोग आपल्यावर झाला तर देशाला संकटातून बाहेर पडणं कदापि शक्य नाही. भारताबरोबर युध्द व्हावं, हे पाण्यात माथी बुडवलेल्या चीनला हवं आहे. त्यांना आपल्या सीमा काबीज करायच्या आहेत. आधीच चीनच्या अतिक्रमणाने गिळंकृत केलेल्या सीमा संकटात आहेत. युध्द झालंच तर या भूमिचा वापर चीनला करता येईल आणि सीमा भारतात आणता येईल, असा त्या देशाचा इरादा. अमेरिका आपल्याला कदाचित शस्त्र पुरवेल, दारुगोळा देईल, उपकरणं पुरवेल पण मुलाबाळांचे प्राण देणार नाही. याचा अर्थ पाकिस्तानला सारं माफ मुळीच नाही. पहेलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे. पण सुडाच्या भावनेने शहाणपणात आंधळेपणा नको, असं त्यांनी आपल्या पत्रात सूचवलंय. प्रचंड वादळात धिराने उभं राहण्याचं साहस दाखवा, क्रोधाने नव्हे, करुणेने नेतृत्व करा. तुमच्या हाती ज्यांचे जीव आहेत ती केवळ आकडेवारी नाही ती स्वप्नं आहेत. आज ज्या प्रकारे काश्मीरची कोंडी केली जातेय ती पाहाता आपण काश्मिरींना आपल्यापासून दूर ढकलतो आहोत, असे खडेबोल त्यांनी बजावले आहेत. कोणीतरी दहशतवादाला खत घातलं म्हणून सगळ्याच काश्मिरींना शुळावर चढवत आहोत. दहशतवाद निराशेवर पोसला जातो. मोडकळीस आलेल्या, सोडून दिलेल्या, तुटलेल्या माणसांच्या कानात द्वेष फुंकरतो आहे. अशा काश्मीरला आपण एकाकी सोडलं तर त्याचा गैरफायदा दहशतवादी घेत असतात, हा आपल्या देशाचा अनुभव बोलका आहे.
मोफत विमान पाठवून पर्यटकांना माघारी बोलवून आपण काश्मीरवर अघोषित बहिष्कार टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण करतो, इतकी अक्कलही सत्ताधार्यांना नाही. आखाती देशात युध्दजन्य परिस्थितीच निर्माण झाली, असं हे कृत्य होय. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि आठ तासात मुंबई उभी राहिली. दहशतवाद्यांचा इरादा फोल ठरला. पर्यटकांना माघारी बोलवून काश्मीर उभं राहणार नाही. उलट दहशवाद्यांनाच चालना दिल्यासारखं होईल. काश्मीरची ही अवस्था कोणत्याही प्रामाणिक भारतीयाला कदापि सहन होणार नाही. ती कविता गाडगीळ यांना सहन का व्हावी? काश्मीरमधील व्यावसायिकांना अव्हेरतो तेव्हा तेही आपला दुष्वास करतात. वाढती बेरोजगारी नको तो मार्ग अवलंबत असते. काश्मीर हा आपला अविभाज्य घटक आहे. ज्यांनी काश्मीरला वेगळं पाडण्याचा प्रयत्न चालवलाय त्यांना रोखा, असं कविता गाडगीळ मोदींना नम्रपणे सांगताहेत. 1947 चं कबायली आक्रमण असो वा कारगीलचं युध्द असो. स्थानिक गुराखी, गुज्जर, बकरवाल, गाईड आणि स्थानिकांनीच सुरक्षा यंत्रणांना सतर्क केलं होतं. पहेलगामच्या हल्ल्यानंतर काश्मिरींनी केलेली सेवा कोणीही विसरू शकत नाही. त्यांच्यावर अविश्वास टाकणं हा हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा आहे. तो आता देशभर पसरतो आहे. मुस्लिमाच्या दुकानातून खरेदी करू नका असे फतवे काढणारे दहशतवाद पसरवत आहेत. अशाने देश कोसळेल, हे सांगणार्या कविता गाडगीळ आणि याच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी या देशद्रोही ठरत असतील आणि पंतप्रधान ते उघड्या कानाने ऐकत असतील तर देशाचं कसं होणार…?




