महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या पाण्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप जलसंपदा विभागाने पोलीस बळाचा वापर करून काढण्यास सुरुवात केल्याने संतप्त शेतकरी संतप्त झाले असून “पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा,” अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. चाऱ्याची कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांनी कालव्यातून तात्पुरते पाणी घेण्यासाठी पाईप टाकले होते. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे पाईप तोडून टाकले. या कारवाईच्या निषेधार्थ भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी जलसंपदा विभागाने यापुढे पाईप तोडणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसांतच जलसंपदा विभागाने आपले म्हणणे फिरवत आज (रविवार ४ मे) पोलीस बळासह निमगाव बुद्रुक येथे धाव घेतली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा मोठा जमाव तिथे जमला आणि अधिकाऱ्यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, राहुरी तालुक्यात कालव्याचे क्षेत्र केवळ १६ किलोमीटर असताना त्यांना २० दिवस पाणी दिले जाणार आहे. तर संगमनेर तालुक्यात ४८ किलोमीटर क्षेत्र असूनही आम्हाला फक्त २० दिवस पाणी देण्याची तयारी अधिकारी दर्शवत आहेत.
या असमान पाणी वाटपाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. निळवंडे धरण आणि कालव्यांसाठी संगमनेर तालुक्यातील जनतेने मोठे योगदान दिले आहे. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मदत केली. त्यामुळे या पाण्यावर पहिला हक्क असताना प्रशासनाकडून अन्याय का केला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
सध्या संगमनेर तालुक्यातील उजवा कालवा लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहे. निमगाव बुद्रुक येथे इंद्रजीत थोरात यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभाग आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया___
“आमच्या हक्काचे पाणी आमच्या डोळ्यादेखत वाहून जात आहे आणि आम्ही फक्त बघायचे? आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या आणि आता हक्काचे पाणी नाकारले जात आहे. प्रशासनाने जबरदस्ती केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. गोळ्या घाला, पण आम्ही आमचे पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही.” – शिवाजी वलवे, सरपंच, मिर्झापूर
“शासनाने आमचा अंत पाहू नये. पाईपने पाणी भरणे किती कठीण आहे, हे अधिकाऱ्यांना काय माहीत? एका पाईपाला चार तास लागतात. जर आमचा हक्क डावलला गेला, तर आम्ही सर्व शेतकरी इथेच जलसमाधी घेऊ.” – अरुण गुंजाळ, उपसरपंच, निमज
“एकतर संगमनेर तालुक्याला नियमानुसार साठ दिवस पाणी द्या, अन्यथा पहिल्यांदा आम्हाला पाणी द्या आणि मग तुम्हाला जितके दिवस खाली पाणी द्यायचे आहे तितके द्या. राहुरी आमचे भाऊ आहेत, पण एकाला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय आम्ही सहन करणार नाही.” – सतीश खताळ, संचालक, बाजार समिती, संगमनेर.



