महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले:
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाला तातडीने सूचना दिल्या होत्या. संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून गावपातळीवरील जलस्रोत आटले आहेत. यामुळे नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले होते. या सर्व परिस्थितीचा विचार करून हे बिगरसिंचन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाणी सोडण्यात आले तेव्हा निळवंडे धरणामध्ये ५५१५ दलघफू म्हणजेच ६६.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर भंडारदरा धरणात ६३४४ दलघफू म्हणजेच ५७.४७ टक्के पाणीसाठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.
प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, हे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. या आवर्तनामुळे तिन्ही तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटण्यास मदत होणार आहे.






