
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे काम काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले असून, यामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने संगमनेरच्या तहसीलदारांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
जलजीवन योजनेचे मुख्य पाईपलाईनचे काम उद्भवापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्ण झाले होते, मात्र गावातील काही शेतकरी ही पाईपलाईन त्यांच्या क्षेत्रातून नेण्यास मज्जाव करत आहेत. यामध्ये दिलीप श्रीहरी नागरे, सत्पाल भिमाजी नागरे आणि सुखदेव रामभाऊ नागरे या शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही हे शेतकरी कोणाचेही ऐकण्यास तयार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ग्रामस्थांसोबतच शाळेतील लहान मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
याच परिस्थितीमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेची मुख्य पाईपलाईन संजय शिवराम फड यांनी घराचे कॉलम घेताना तोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाईपलाईन फोडण्यात आल्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यास देखील संबंधित शेतकऱ्यांकडून अडथळा निर्माण केला जात आहे. या अडवणुकीमुळे गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाने यात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.
या गंभीर समस्येबाबत शेडगाव ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांच्याकडेही पत्रव्यवहार केला आहे. शेवटी, गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा आणि जलजीवन मिशनची पाईपलाईन पूर्ण व्हावी यासाठी तहसीदारांनी तातडीने निर्णय घेऊन मदत करावी, अशी कळकळीची विनंती सरपंच राजेंद्र चंद्रभान बर्डे यांनी केली आहे.
या पत्राच्या प्रती माहितीसाठी गटविकास अधिकारी, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून आता यावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शेडगावकरांचे लक्ष लागले आहे.






