
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी:
निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कडक उन्हाचा तडाखा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून येत्या १५ एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे, तर डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होईल.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेत आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच विखे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजित वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनीही या पाण्याचा लाभ मिळावा अशी मागणी केली होती, ती पालकमंत्र्यांनी मान्य केली आहे. या निर्णयामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. शेती पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण पसरले आहे. जलसंपदा विभागाने या आवर्तनाचे नियोजन पूर्ण केले असून, ठरलेल्या तारखेला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.






