महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली आहेत, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याचे पाणी आणि पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन दिले. हे निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले असून, यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, विजय मगर, विलास गुळवे, मच्छिंद्र काळे, दत्ता भालेराव, अनिल गुंजाळ आणि संतोष राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या सर्वत्र उन्हाची लाट पसरल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता भासत असून शेतकऱ्यांनी उभी केलेली पिकेही जळून चालली आहेत. लोकनेते थोरात यांनी कष्टातून उभा केलेला हा प्रकल्प असतानाही सध्याचे प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन दिसत असल्याची टीका अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी केली. एप्रिल अखेरपर्यंत पाण्याचे आवर्तन मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सचिव उत्तमराव घोरपडे यांनी इशारा दिला की, शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही त्यालाच पाण्यासाठी वंचित ठेवले जात आहे, जर वेळेत पाणी मिळाले नाही तर पशुधनासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता हापसे व कवडे यांनी महिनाअखेरीस पाणी सोडण्यासाठी योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे तळेगावसह दुष्काळी भागातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण असून कृती समितीच्या या भूमिकेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.






