
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या धडक कारवाईचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि त्यांनी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केल्याबद्दल आमदार खताळ यांनी सैन्याचे अभिनंदन केले. ही कारवाई केवळ दहशतवादी हल्ल्याचा बदला नसून, भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी दिलेले एक कणखर प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार खताळ म्हणाले, “देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या आपल्या जवानांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळेच आज प्रत्येक देशवासी सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे. या यशस्वी ऑपरेशनमागे जवानांची निष्ठा, संयम आणि निस्वार्थ देशभक्ती दिसून येते, ती खरंच प्रेरणा देणारी आहे.”

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना आमदार खताळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि निर्णायक नेतृत्वामुळेच भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे, हे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेवरून स्पष्ट होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याची आणि दहशतवाद्यांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची सरकारची भूमिका या कारवाईतून दिसून येते.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या शक्तींना एक स्पष्ट आणि कठोर संदेश पोहोचला आहे. भारताच्या सीमा, नागरिक आणि जवानांवर हल्ला करणाऱ्यांना त्वरित आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, हे या ऑपरेशनने दाखवून दिले असल्याचे म्हटले.


