संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आता ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या देवस्थानाला हा मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

वेल्हाळे आणि परिसरातील भाविकांसाठी हरीबाबा देवस्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या मंदिर परिसरात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, भौतिक सुविधांच्या अभावामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार सत्यजित तांबे यांनी या समस्येची दखल घेत, जिल्हा नियोजन समितीकडे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
30 जानेवारी 2025 रोजी त्यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन या मागणीचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला.
या निर्णयामुळे आता हरीबाबा मंदिर परिसरात सुशोभीकरण आणि भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. वेल्हाळे, हरीबाबा देवस्थान ट्रस्ट, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी, अमृतनगर, गुंजाळवाडी, चिकणी, राजापूर, क-हे, सुकेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले: “माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हरीबाबा देवस्थानचा विकास करणार आहोत. तालुक्यातील इतर देवस्थानांप्रमाणेच या देवस्थानाचाही पर्यटन विकास साधला जाईल. भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.”


