
संगमनेर, दि. ११ मे:
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमधून साकारलेली आणि ५० लाख रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडली आहे. यामुळे संगमनेर शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असा परखड सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी संगमनेर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तांबे यांनी संगमनेर मधील सीसीटीव्ही शोभेचे बाहुले बनले असल्याचे वास्तव समोर आणले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे जर चालू राहिले तर यात अनेक अवैध चालणाऱ्या गोष्टी देखील छायाचित्रे होऊन त्याची मदत पोलीस यंत्रणेला होऊ शकणार आहे. मात्र यासाठी पोलीस यंत्रणेची मानसिकता दिसत नाही.
आमदार तांबे म्हणाले की, संगमनेर हे केवळ एक वैभवशाली आणि सुसंस्कृत शहर नाही, तर ते एक महत्त्वपूर्ण व्यापारी आणि आर्थिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. येथे राहण्यासाठी लोकांची पहिली पसंती असते आणि दररोज लाखो नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या प्रयत्नातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेने ५० लाख रुपये खर्चून अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारली होती.

विशेष म्हणजे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी एक हायटेक कंट्रोल रूम देखील तयार करण्यात आली आहे. नगरपालिकेने ही संपूर्ण यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित केली असून, तिची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पूर्णपणे पोलीस प्रशासनाची आहे.
परंतु, आमदार तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, पोलीस प्रशासनाच्या घोर उदासीनतेमुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. याचा थेट परिणाम शहरात वाढलेल्या चोऱ्यांच्या प्रमाणात दिसून येत आहे. महिला आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून, शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर शहरात आता अशांततेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
“जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही नसेल अशी आधुनिक कंट्रोल रूम संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये उभारली आहे. ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या अद्यावत सीसीटीव्ही यंत्रणेची आणि कंट्रोल रूमची देखभाल दुरुस्ती का होत नाही? यामागे प्रशासनाची निव्वळ उदासीनता आहे की आणखी कोणाचा दबाव आहे?” असा थेट सवाल आमदार तांबे यांनी विचारला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर, पोलीस प्रशासनाने या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाढत्या गुन्हेगारीला प्रशासन जबाबदार:
आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरने एक विश्वासाचा ब्रँड तयार केला आहे. मात्र, सध्या पोलीस प्रशासनाचे शहराकडे लक्ष नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरात अशांतता, असुरक्षितता, टोळी युद्ध आणि गुंडागिरी वाढत आहे. या सर्व गोष्टींना केवळ आणि केवळ पोलीस प्रशासनच जबाबदार आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
आता पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करते आणि शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करते का, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
५० लाखांची सीसीटीव्ही यंत्रणा धूळखात! पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे संगमनेर असुरक्षित? आमदार तांबेंनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आणले वास्तव समोर
सध्या पोलीस प्रशासनाचे शहराकडे लक्ष नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरात अशांतता, असुरक्षितता, टोळी युद्ध आणि गुंडागिरी वाढत आहे. या सर्व गोष्टींना केवळ आणि केवळ पोलीस प्रशासनच जबाबदार आहे

