अहिल्यानगर, दि.११ मे:
संगमनेर शहरात गौण खनिजांची चोरी, अवैध धंदे, मटका आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यांच्या या मागणीमुळे संगमनेरातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
याच बैठकीत आमदार खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातील विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याची माहिती आपल्या समाज माध्यमातून दिली आहे.
आमदार खताळ यांनी वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती, ज्याला मान्यता मिळाली आहे. याबद्दल त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानले. यासोबतच, शाहीर विठ्ठल उमप आणि कवी अनंत फंदी यांच्या स्मारकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली, यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/share/p/16QrZxKNw1/
विश्वगुरु श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे १७ जून २०२५ रोजी पालखी मुक्कामी असणार आहे. या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय आणि निवारा यांसारख्या आवश्यक सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती आमदार खताळ यांनी केली, या अनुषंगाने प्रशासनाला योग्य निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवताना आमदार खताळ यांनी पाणी आणि चारा टंचाई तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने वरिष्ठांना सादर करण्याची मागणी केली, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळू शकेल. तसेच, महादेव प्रणाली अंतर्गत पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत आहे का, याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
याव्यतिरिक्त, आमदार खताळ यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात टँकरची संख्या वाढवण्याची आणि टँकरमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी केली. जमीन नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी गायरान जमिनीचा वापर करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची सूचना त्यांनी केली. नाशिक-पुणे महामार्ग प्रकल्पातील प्रलंबित भूमी अधिग्रहणाच्या मोबदल्याच्या फाईल्स तातडीने निकाली काढण्याची मागणीही त्यांनी केली. बंद पडलेली पर्जन्यमापक यंत्रे आणि धोकादायक विद्युत तारा दुरुस्त करण्यासाठी महावितरणला तातडीने सूचना देण्याची मागणी त्यांनी या बैठकीत केली.
या बैठकीला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह नगर जिल्ह्यातील आमदार व विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. संगमनेरातील अवैध धंद्यांसारख्या गंभीर विषयावर आमदारांनी पुन्हा एकदा थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवल्यामुळे आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


