नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अण्वस्त्रांच्या धमक्यांना न जुमानता निर्णायक प्रहार करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे सरकार यांच्यात फरक नसल्याचेही त्यांनी ठणकावले.

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पहिल्यांदाच जाहीर भाषणात बोलताना मोदींनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि लष्करावर घणाघात केला. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी उपस्थित राहणे, हे ‘सरकारपुरस्कृत दहशतवादा’चे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांद्वारे भारताने दहशतवादाविरोधात नवी रणनीती आखली आहे.
पाकिस्तानने अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिल्याने अमेरिकेने मध्यस्थी केल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. भारताच्या आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानला जागतिक स्तरावर मदतीची याचना करावी लागली. १० मे रोजी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीसाठी भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत भारताने दहशतवादाचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते, असे मोदींनी स्पष्ट केले.
पाकिस्तानमधील दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणांवरील कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली असून, पुढील पावले पाकिस्तानच्या भूमिकेवर अवलंबून असतील, असे मोदींनी सांगितले. युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला नेहमीच धूळ चारली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताने युद्धनीतीमध्ये नवीन आयाम जोडला आहे.

दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार, रक्त आणि पाणी एकत्र चालू शकत नाहीत, असे मोदींनी स्पष्ट केले. पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यांवरच होईल, असे त्यांनी जागतिक समुदायाला सांगितले.
पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांच्या हत्येचा उल्लेख करत मोदींनी दहशतवादाचा क्रूर चेहरा जगासमोर आणला. या हल्ल्याने देशाच्या सद्भावनेला तडा देण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. देशातील एकता आणि नागरिकांच्या पाठिंब्यामुळे कठोर निर्णय घेणे शक्य झाले.
बहावलपूर आणि मुरिदके ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठे असून, ९/११ आणि लंडन बॉम्बस्फोटांसारख्या हल्ल्यांचे धागेदोरे तिथे आढळले, असे मोदींनी सांगितले. पाकिस्तान सरकारने दहशतवादाला खतपाणी घातल्यास, तोच देश एक दिवस त्यात बुडेल, असा इशारा त्यांनी दिला. भगवान बुद्धांनी शांततेचा मार्ग दाखवला असला, तरी त्यासाठी शक्ती आवश्यक आहे. गरज पडल्यास, भारत शक्तीचा वापर करेल, असे मोदींनी स्पष्ट केले.


