संगमनेर – प्रतिनिधी
राज्यातील महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या आणि सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठी दिशादर्शक टिपलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एकमताने निवड झाली आहे. यासोबतच, व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग घुले यांची देखील सर्वानुमते निवड झाली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आज (मंगळवारी) प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही कारखान्याने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. सुरुवातीपासूनच सहकार महर्ष भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कारखान्याची वाटचाल राहिली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि राजकीय दृष्टिकोनाचा फायदा निश्चितच कारखान्याच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास संचालक मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कारखान्याच्या विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत आणि यापुढेही राहतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले यांनीही सहकारात यापूर्वी विविध पदांवर काम करत असताना कारखान्याच्या विकासात सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि सहकारातील अनुभवाचा लाभ कारखान्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीनंतर बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संचालक मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत शेतकऱ्यांचे हित जपणे आणि कारखान्याची आर्थिक प्रगती साधणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल. तसेच, पांडुरंग घुले यांच्यासारख्या अनुभवी सहकाऱ्याच्या साथीने आपण हे आव्हान निश्चितपणे पार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता वातावरण बदलले आहे. तालुक्यात दहशत वाढते की काय असा प्रश्न आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा विचार करा. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने लढा. कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांना पहिली आपल्या तालुक्याची संस्कृती समजून असे सांगताना आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी जास्त काम करावे लागेल.
पांडुरंग घुले यांनीही चेअरमन आणि संचालक मंडळाचे आभार मानले आणि शेतकऱ्यांच्या तसेच कारखान्याच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.

या निवडीमुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखाना आणखी उंची गाठेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आगामी काळात कारखाना व्यवस्थापन आणि नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासाठी काय नवीन उपक्रम राबवले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीने त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले होते. विधानसभा घेतली, आता कारखानाही घ्यायचा, या इर्षेने त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना माजी मंत्री थोरात यांनी मात देत कारखान्याची निवडणूकच बिनविरोध करून खताळ यांच्यासाठी कारखान्याची वाट एवढी सरळ नसल्याचे दाखवून दिले. राजकीय घडामोडीनंतर खताळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या विरोधकांनी सपशेल माघार घ्यावी लागली होती.



