मुंबई –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यभरात संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ५८ नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निवडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

विधानसभा निवडणुकांनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘संघटन पर्व’ अभियान यशस्वीरित्या राबवून दीड कोटी नवीन सदस्यांची नोंदणी पूर्ण केली. ही सदस्य नोंदणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची रणनीती मानली जात आहे.
https://x.com/BJP4Maharashtra/status/1922220666297713066?t=2k_iZ7sCUaO21JLggAJQpA&s=19

या पार्श्वभूमीवर, भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ५८ जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर केली आहे. अहिल्यानगर उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर व दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग निवड करण्यात आली आहे. मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी तीन पदे तयार करण्यात आली असून, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसाठी अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी आणि वीरेंद्र म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांनी जारी केलेल्या परिपत्रकात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई या प्रदेशांमधील जिल्हाध्यक्षांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यापूर्वी, राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, भाजपने ही ‘भाकरी फिरवली’ असल्याचे मानले जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महानगरपालिकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासोबतच, राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.



गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. २०२२ च्या राजकीय आरक्षणासह या निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, भाजपने जाहीर केलेल्या या नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

