महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.

शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लाखो कामगार आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोणत्याही सुरक्षा कवचाविना राहतो, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे विट उत्पादकांचे म्हणणे आहे.

राज्य सरकार कुंभार समाजाला मातीवरील रॉयल्टी माफ करते, परंतु मार्च एंडला विट व्यावसायिकांकडून सक्तीने वसुली करते. त्यामुळे आमच्या मागण्यांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून विट उत्पादकांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी कुंभार समाज विट उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातील विट व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने यावर विचार करून योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यातील विट व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका; विमा संरक्षणाची मागणी
या गंभीर परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातील विट व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने यावर विचार करून योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

