
संगमनेर –
संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक या कारवाईसाठी नेमण्यात आले होते. या पथकात सरकारी कामगार अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. सुमारे १० ते १२ सदस्यांच्या तीन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी या दगडखाणींवर धडक कारवाई केली आणि वेठबिगार तसेच बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

मुक्त करण्यात आलेले सर्व वेठबिगार आणि बालकामगार हे पालघर जिल्ह्यातील आहेत. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत तहसीलदारांच्या स्वाक्षरीने त्यांना बंधमुक्तता प्रमाणपत्र प्रदान केले. यानंतर, पोलीस संरक्षणात या सर्वांना त्यांच्या मूळ गावी, पालघर येथे रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान मुक्त केलेल्या स्त्री, पुरुष आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर, संगमनेर प्रशासनाच्यावतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ठेकेदार राठोड याच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (ॲट्रॉसिटी कायदा) आणि वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, १९७६ च्या संबंधित कलमांनुसार गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


