महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : संगमनेर शहर गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीच्या बेड्यांमध्ये जखडले आहे. विकासकामांची चाके जाम झाली आहेत आणि नागरी समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली. शहरातील प्रलंबित प्रश्नांची जंत्री त्यांच्यासमोर मांडत, येत्या १५ दिवसांत या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा, नगरपरिषदेला हादरवून सोडणारे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी तरसत आहेत. पावसाळा तोंडावर असताना गटारे तुंबलेली आहेत, रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत, उद्याने कचऱ्याचे ढिग बनली आहेत, तर रात्रीच्या अंधारात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीमुळे कोण वाली आहे, असा सवाल आता संगमनेरकर विचारू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी शहरातील संतप्त नागरिक एकवटले आणि त्यांनी थेट नगरपरिषदेच्या प्रशासनाला धारेवर धरले.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, निखिल पापडेजा, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, जीवन पंचारिया, अभय वाजे, अरुण काका गावित्रे, मुस्ताक शेख, शेख अहमद, प्रकाश कडलग, मनोजकुमार गंगवाल, सुभाष सानप, ॲड. अशोक हजारे, ॲड. सुहास आहेर, सुमित पवार, शशिकांत पवार, सतीश शिंदे, सुभाष दिघे, अंबादास आडेप, विशाल निळे, ललित शिंदे, सुरेश झावरे, विजय पवार, श्रीकांत सांगळे, संतोष मुर्तडक, शब्बीरभाई बोहरी, अरुण हिरे, सौरभ उमरर्जी, प्रमोद गणोरे, सोमनाथ श्रीपाद, सौदामिनी कान्होरे, सुषमा भालेराव, शिवांजली गाडे आणि सुनीता कांदळकर यांसारख्या अनेक प्रमुख नागरिकांचा समावेश होता. या सर्वांनी एकत्रितपणे मुख्याधिकाऱ्यांसमोर शहरातील ज्वलंत प्रश्न मांडले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
निवेदनात पावसाळ्यापूर्वी शहरातील नाटकीनाला व उपनद्यांची तातडीने साफसफाई, अनेक वर्षांपासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेचे काम त्वरित पूर्ण करणे, शहराची ओळख असलेल्या उद्यानांची स्वच्छता करून तेथील अवैध धंदे बंद करणे व गैरवापर थांबवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करणे आणि धोकादायक विजेच्या तारांवरील झाडांच्या फांद्या तोडणे, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या विकासकामांना त्वरित सुरुवात करणे, शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना सूचना देऊन त्या हटवणे, पावसाळ्यापूर्वी म्हाळुंगी नदीच्या पुलाला कठडे बसवणे, शहरात हैदोस घालणाऱ्या मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करणे, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सुलभ शौचालये व युरिनलची नियमित स्वच्छता करणे, वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करणे, प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांच्या निविदा त्वरित काढणे, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे आणि वापरात नसलेले जुने पथदिवे हटवणे, साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी अपंगांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न तातडीने सोडवणे यांसारख्या महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी संतप्त नागरिकांच्या भावनांना वाट करून देताना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. “संगमनेर शहराला आम्ही ४० सुंदर उद्याने दिली, पण आज त्यांची अवस्था बघवत नाही. लहान मुलांच्या खेळण्याची साधने तुटली आहेत. शहराची स्वच्छता आणि सौंदर्य बिघडवण्याचे काम सुरू आहे, हे आता थांबायलाच हवे,” गेल्या तीन-चार वर्षांपासून संगमनेर नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाला शहराच्या समस्यांची जाणीव राहिलेली नाही. आम्ही आता १५ दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर संगमनेरमधील नागरिक रस्त्यावर उतरतील आणि या निष्क्रिय प्रशासनाला जागे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत!



