महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यात यश आले आहे. या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये घुलेवाडी येथील सव्वादोन कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे उच्च दर्जाची झाली पाहिजेत, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले. कामाचा दर्जा चांगला राखल्यास ठेकेदार या तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम करू शकतील, अन्यथा त्यांनी इतरत्र कामे शोधावी लागतील, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासांतर्गत मंजूर झालेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, अल्पसंख्यांक सेनेचे तालुकाध्यक्ष मंजाबापू साळवे, रवींद्र गिरी, शिवसेना शाखाप्रमुख शरद पानसरे, ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक वाडेकर, भाजप उपाध्यक्ष भिकाजी राऊत, सीताराम पानसरे, विलास राऊत, कैलास काशीद, स्वरूप राऊत, संजय पानसरे, रोशन कोथिंबीरे, स्वप्निल राऊत, सुनील राऊत, सुरज राऊत, प्रशांत राऊत, सुनील पानसरे, ओंकार राऊत, वैभव राऊत, रवी दिवे, विजय घुले, ओंकार काळे, आकाश पवार, सागर पवार यांच्यासह पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता नाना अहिरे आणि घुलेवाडी ग्रामपंचायत अधिकारी रामदास दरेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, घुलेवाडी ही काही लोकांची जहागीरदारी आहे, असा त्यांचा समज होता. त्यांनी कधीही वंचित समाजबांधवांच्या भागाचा विकास केला नाही. निवडणुका आल्यावरच त्यांना विकास दिसतो आणि इतर वेळी ते केवळ निवडणुकीपुरताच या समाजबांधवांचा वापर करतात. मात्र, आता कार्यक्रम संपल्यावर अनेकांना धमक्यांचे फोन येतील, परंतु त्यांच्या दादागिरीला घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या तालुक्यातील दहशत आणि दादागिरी मोडून काढली असून, आता त्यांचे काही बगलबच्चे राहिले आहेत. सर्वांनी साथ दिल्यास त्यांचाही बंदोबस्त करू, असे ते म्हणाले. मतदारसंघातील सामान्य जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, विकासकामांच्या माध्यमातून केवळ घुलेवाडीच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ आतापर्यंत सर्वांना मिळाला आहे. जे कोणी या योजनांपासून वंचित राहिले आहेत, त्यांनाही महायुती सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. राजकारण हे विकासकामांसाठी असले पाहिजे. कार्यक्रमाला आलेल्यांना धमक्यांचे फोन येतील, पण त्यांच्या धमक्यांना भीक घालू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा पुनरुच्चार आमदार खताळ यांनी केला.
घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात महायुती सरकारने सोनोग्राफी आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी आरोग्य सुविधा देणे शक्य असूनही, काही लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या दवाखान्यांसाठी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य आणि जनतेच्या विकासाचे प्रश्न सुटले नाहीत, हे त्यांचे अपयश आहे, अशी टीका आमदार खताळ यांनी केली.


