
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
घुलेवाडीतील विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा शुभारंभ नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्याने गावात तीव्र नाराजी पसरली आहे. एक रुपयाचाही नवीन निधी न आणता थोरातांच्या कामांवर हक्क सांगणे योग्य नाही, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केला आहे. यामुळे घुलेवाडीत राजकीय वादंग पेटले आहे.
काय आहे नेमके प्रकरण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. या निधीतून गावठाणातील पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रस्ते काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार, रस्ते डांबरीकरण, म्हसोबानगरातील विकासकामे, वीजपुरवठा आणि रस्ते मजबुतीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या कामांचे उद्घाटन केल्याने वाद निर्माण झाला आहे.
घुलेवाडीतील नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थ आणि महिलांनी निषेध व्यक्त केला असून, थोरातांनी दिलेल्या निधीवर दुसऱ्यांनी हक्क सांगणे योग्य नाही, यापुढे जुन्या कामांचे उद्घाटन केल्यास संपूर्ण गाव विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे घुलेवाडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

थोरातांच्या कामांवर डोळा? – सीताराम राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासकामे झाली आहेत. घुलेवाडीतील कामांसाठी त्यांनीच निधी मंजूर केला होता. नव्या लोकप्रतिनिधींनी एक रुपयाचाही नवीन निधी आणलेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी जुन्या कामांचे उद्घाटन केले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.
सरपंचांचाही संताप – घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत यांनीही नव्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. “थोरातांनीच गावासाठी निधी दिला आहे. आजही अडचणी आल्यास ग्रामस्थ त्यांच्याकडेच जातात. नव्या लोकप्रतिनिधींना याबाबत काहीही माहिती नाही. त्यांनी नवीन निधी आणावा आणि मगच उद्घाटन करावे,” असे त्यांनी म्हटले आहे.



