नांदेड –
बीड जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना नांदेड येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी, “बीडमधील घटना दुर्दैवाने महाराष्ट्राला लाज वाटाव्या अशा आहेत. सरकार यावर काय करतेय?” असा संतप्त सवाल विचारला.
थोरात म्हणाले की, बीडमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. या गुन्हेगारीचा संसर्ग इतर जिल्ह्यांमध्ये पसरतो की काय, अशी भीती वाटत असताना सरकारची निष्क्रियता हा मोठा प्रश्न आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर राज्याचे आणि देशाचे भवितव्य काय, अशी मोठी काळजी त्यांना वाटत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागतावरून प्रशासनावर ताशेरे… भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने त्यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक आणि आनंद व्यक्त होत आहे. गवई हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना त्यांचे संपूर्ण महाराष्ट्र स्वागत करत आहे. मात्र, प्रशासनाच्यावतीने मुख्य सचिवांची अनुपस्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याचे थोरात यांनी नमूद केले.

भाजपच्या ‘तिरंगा यात्रे’वरही टीका… भाजप सध्या पाकिस्तानसोबत झालेल्या शस्त्रसंधीनंतर ‘तिरंगा यात्रा’ काढत आहे. यावर बोलताना थोरात यांनी भाजप कशाचा आनंद साजरा करत आहे, हे कळत नसल्याचे म्हटले. केवळ त्यांनी ‘तिरंगा’ हा शब्द मान्य केला याचाच आनंद आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसची भूमिका देश आणि संविधानाचे संरक्षण… काँग्रेसने कायम देशाचे सार्वभौमत्व आणि राज्यघटना जपण्यासाठी काम केले आहे. संरक्षण किंवा परराष्ट्र धोरणाबाबत काँग्रेस नेहमीच सरकारच्या पाठीशी उभी राहिली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समविचारी पक्षांना सोबत घेऊन एकत्रित निर्णय घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरात यांच्या या विधानांमुळे बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


