संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आरोग्य विभागाचे लक्ष वेधल्यानंतर व ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने बेकायदेशीर गर्भपात प्रकरणांबाबत प्रकाशित केलेल्या दोन भागांच्या विशेष वृत्तांकनानंतर आरोग्य विभागाने संगमनेरमधील काही डॉक्टरांना रडारवर घेतले आहे. या वृत्तांकनामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, आता हे डॉक्टर आरोग्य विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मुलींचा घटता लिंगदर आणि वाढते बेकायदेशीर गर्भपात यामुळे समाजात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण… महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वृत्तांकनात संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रांवर प्रकाश टाकला होता. यात एका महिलेची मोठी हेळसांड होऊन त्या महिलेच्या मृत्यूनंतर देखील आरोग्य विभाग थंडच होता. संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान करून मुलींचा गर्भपात केला जात असल्याचा संशय सातत्याने व्यक्त होत असतो. कायद्याची पायमल्ली करणाऱ्या काही डॉक्टरांच्या नावांची यात सर्रासपणे चर्चा देखील होते, मात्र आरोग्य विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आला आहे. यामुळे समाजातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बिघडत असून, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या शासकीय योजनांनाही यामुळे खीळ बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.
संगमनेर तालुक्यातील एका महिलेला गर्भपात प्रकरणात आपला जीव गमवावा लागला. शहर व तालुक्यातील एका बोगस मुन्नाभाईसह काही डॉक्टरांची नावे या प्रकरणी चर्चेत आली आहे. दरम्यान या प्रकरणाचा जास्त गवगवा होण्यापूर्वीच चौकशी झाल्याचे दर्शविण्यात आले. मात्र आता याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी थेट चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात सहभागी असलेल्या बोगस मुन्नाभाईवर देखील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल केला जातो का? हे देखील बघणे औचित्याचे ठरणार आहे.
संगमनेरमधील संशयित डॉक्टरांच्या दवाखान्यांची आणि त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी असलेल्या PNDT (Pre-Natal Diagnostic Techniques) कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी केली जात आहे. ज्या डॉक्टरांवर संशय आहे, त्यांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या असून, त्यांचे स्पष्टीकरण मागवले आहे. त्यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय नोंदी आणि इतर कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात आहे.
या चौकशीमुळे संगमनेरमधील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य क्षेत्राची लाज राखण्यासाठी क्लीनचीट दिली जाते की कठोर कायदेशीर कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांचे वैद्यकीय परवाने रद्द करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि मोठे दंड आकारणे अशा स्वरूपाची कारवाई केली जाते का याकडे देखील लक्ष लागले आहे.
संगमनेर शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्या आधारे ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या गंभीर विषयावर आवाज उठवून समाज आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आता या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (क्रमशः)

