महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर शहर आणि तालुक्यात सध्या गोवंश हत्या आणि मांस तस्करीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचा धाक उरला नसल्याने की काय, पण तालुक्यात गोवंश कत्तलींचे सत्र अगदी ‘धडाक्यात’ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गोवंश कत्तलींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाही, प्रत्यक्षात यंत्रणांच्या अभद्र युतीमुळे जमिनीवर मात्र काहीच बदल होताना दिसत नाही. तात्पुरत्या मलमपट्टीचा अपवाद वगळता सर्व काही जैसे थे होताना दिसत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नेत्यांनी या कत्तलींना जणू मूक संमतीच दिल्याचे भासते.
या संपूर्ण गोरखधंद्यात पोलीस प्रशासन, बडे राजकीय नेते, पदाधिकारी, कथित पत्रकार आणि कसाई यांच्यात छुप्या अर्थपूर्ण तडजोडी झाल्याची चर्चा असून, या चोकोनी युतीमुळेच संगमनेरमध्ये गोवंश कत्तलींचे रक्त सांडत असल्याचा आरोप आता जाहीरपणे होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे, ज्या संघटना आणि आंदोलक कालपर्यंत कत्तलखान्यांच्या नावाने रस्ते डोक्यावर घेत होते, ते आता अचानक चिडीचूप झाले आहेत. आंदोलने सुरू होतात आणि काही दिवसांतच त्यांना पूर्णविराम मिळतो. नेत्यांच्या व कसाई मंडळींच्या मैत्रीचे फोटो सोशल मीडियावर झळकतात, यावरून या संघटनांचा विरोध हा केवळ मलिद्यातील वाटा वाढवून घेण्यासाठी होता की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या भागात कत्तली होतात, तिथल्या बीट मार्शलपासून ते डीबी पथकापर्यंत, पोलीस निरीक्षकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या अवैध धंद्यांची इत्थंभूत माहिती असते. तरीही, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जेव्हा नगरहून येऊन छापा टाकते, तेव्हाच कारवाईचे दर्शन घडते. स्थानिक पोलिसांना जे दिसत नाही, ते जिल्ह्याच्या पथकाला कसे दिसते, हा संशोधनाचा विषय आहे.
शहर पोलीस अधून-मधून एखादी किरकोळ कारवाई करून चमकण्याचा प्रयत्न करतात, मात्र मुख्य सूत्रधार आणि मोठे कत्तलखाने नेहमीच सुरक्षित राहतात. यामध्ये डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचे थेट लागेबांधे असल्याची चर्चा पोलीस दलातच रंगली आहे.
शहरासह ग्रामीण भागातही हे जाळे पसरले आहे. संगमनेर तालुक्यातून गोमांसाची वाहतूक करणारी वाहने सुरक्षितपणे हद्दीबाहेर काढून देण्यासाठी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क सुपारी घेतल्याचे बोलले जात आहे. टनांच्या हिशोबात गोमांस पकडले जात असतानाही, मुख्य पुरवठादार मात्र मोकाट आहेत. तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या संशयास्पद शांतता असून, या शांततेच्या आडून गोवंशाचा व्यापार तेजीत सुरू आहे.
या सावळ्या गोंधळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही प्रामाणिक आणि लढाऊ पत्रकार आजही या अवैध धंद्यांविरोधात आपली लेखणी चालवत आहेत. राजकीय दबाव, पोलिसांची डोळेझाक आणि गुन्हेगारांकडून मिळणाऱ्या धमक्यांना न जुमानता हे मोजके पत्रकार आवाज उठवत आहेत. बाकीची मोठी यंत्रणा मात्र ‘मलिद्याचा प्रसाद’ घेऊन गप्प बसणे पसंत करत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत, संगमनेरमध्ये गोवंश रक्षण हे केवळ भाषणापुरते मर्यादित राहिले असून, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या रक्ताच्या पैशांवर अनेकांची घरे चालत असल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे.





