संगमनेर | विशेष प्रतिनिधी
संगमनेर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. पण त्याच डॉक्टरांना वाचवण्यासाठी संगमनेरचे पोलीस चार महिने तक्रारदाराला उंबरठे झिजवायला लावतात, यावरून येथील कायदा सुव्यवस्था नेमकी कोणाच्या खिशात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशाने डॉ. अजिंक्य सोनांबेकर आणि डॉ. अभिजीत कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाने पोलीस दलातील शांततेचे वाभाडे निघाले आहेत.
दत्तात्रय दळवी या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी न्यायासाठी, आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेला लढा थक्क करणारा आहे. १० डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. स्थानिक स्तरावर दाद मिळत नाही हे पाहून फिर्यादीने १८ डिसेंबरला पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेतली. मात्र, तिथेही तोच अनुभव आला. हताश झालेल्या फिर्यादीने ३० डिसेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षकांचे दरवाजे ठोठावले. मात्र, पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयाकडूनही या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही. डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या काळात पीडित कुटुंबाला पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने वाऱ्यावर सोडले, ते पाहता पोलीस नक्की कोणाचे रक्षण करत होते, हे स्पष्ट होते.
पोलीस प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याचे पाहून फिर्यादीने अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतरही डॉ. सोनांबेकर आणि डॉ. कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ लागला. जे काम पोलिसांनी पहिल्या दिवशी करणे अपेक्षित होते, त्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, ही संगमनेर पोलिसांसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.
हा गुन्हा दाखल होताच संगमनेरमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या डॉक्टरांविषयी समाज माध्यमात विविध आरोप प्रत्यारोप होत आहे. संबंधित डॉक्टरांचे नातेवाईक अत्यंत वजनदार आणि राजकीय क्षेत्रात वावरणारे असल्यानेच पोलिसांनी इतके महिने गुन्हा दाखल टाळल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यातच आता आरोपींच्या बचावासाठी डॉक्टरांची संघटना सरसावली आहे. वरिष्ठांचा वरदहस्त आणि बड्यांचे नातेसंबंध यामुळेच खाकी वर्दी या डॉक्टर जोडगोळीसमोर नतमस्तक झाली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन १३ दिवस उलटले तरी आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात दाखवलेली, चौकशीची ही सुस्ती संशयाची सुई अधिक गडद करत आहे.
एकीकडे सर्वसामान्य जनतेला कायद्याचा धाक दाखवणारे पोलीस, या प्रकरणात मात्र इतके ‘मवाळ’ का झाले? गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपींना सुरक्षित मार्ग मिळवून दिला गेला का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांच्या मनात आहेत. संगमनेरच्या या प्रकरणाने पोलीस प्रशासनाची प्रतिमा डागाळली असून, आता या प्रकरणातील पडद्यामागील सूत्रधारांची नावे कधी समोर येणार आणि पीडित कुटुंबाला खरा न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.







संगमनेर | विशेष प्रतिनिधी