संगमनेर, दि. २४ मे
जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहीद गायकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

लष्कराच्या १५ मराठा लाईट इन्फंट्रीमधील १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत असलेले संदीप गायकर यांना २२ मे रोजी तिसवाड सेक्टर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद जवान संदीप गायकर अमर रहें’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा रिहांस याने मुखाग्नि दिला.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी आमदार वैभव पिचड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे, लष्कराच्या वतीने कर्नल केतन प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहिली.

पालकमंत्र्यांकडून स्मारकाची घोषणा… पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ब्राह्मणवाडा येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात प्रशासन सहभागी असून कुटुंबीयांना शासन सर्वतोपरी मदत करेल.
वयाच्या २० व्या वर्षी सैन्य दलात भरती झालेले जवान संदीप गायकर यांनी गांधीनगर, जम्मू व काश्मीरमधील पुंछ सेक्टर, ५६ राष्ट्रीय रायफल्स, मध्य प्रदेशमधील घाना सागर आणि युनायटेड नेशन्स येथे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.


