अहिल्यानगर –
अहिल्यानगर जिल्ह्यातील चास तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

अमितेश बलराज बिडे (वय १०) आणि अनिकेत बलराज बिडे (वय ०६, रा. चास, ता. अहिल्यानगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत. या घटनेने चास परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमितेश आणि अनिकेत हे दोघे भाऊ त्यांच्या घराजवळ खेळत असताना पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या एका डबक्यात पडले. ही बाब लक्षात येताच, त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघेही बेशुद्ध झाले होते.

त्यांचे चुलते जयसिंग बिडे यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


