
संगमनेर, २९ मे २०२५
संगमनेर शहरातील लालतारा परिसरातील नागरिकांना सध्या वाढत्या अस्वच्छतेमुळे गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याचे ढिगारे, मृत जनावरांची कातडी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लालतारा परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागांतील कचरा आणि विशेषतः मृत जनावरांची कातडी सर्रास लालतारा परिसरात आणून टाकली जाते. यामुळे या भागाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी या समस्येबद्दल तक्रार केली आहे, पण आमच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, असे एका संतप्त नागरिकाने सांगितले. या घाणीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आमचे आरोग्य धोक्यात आले आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली.

परिसरातील या वाढत्या अस्वच्छतेमुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी आता नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कचरा आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा कार्यान्वित करावी, परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


