संगमनेर – प्रतिनिधी
ऊस आणि दूध ही शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पिके आहेत. शेतीत ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने होत असलेल्या शेतीच्या वापरामुळे जमिनीत सेंद्रिय द्रव्यांची कमतरता निर्माण झाली असून, ती भरून काढणे गरजेचे आहे. कमी पाणी आणि कमी श्रमात एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणे आवश्यक असून, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

वाघापूर (संगमनेर) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ऊस विशेषज्ञ सुरेश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक संपतराव गोडगे, विनोद हासे, सतीश वर्पे, डॉ. तुषार दिघे, रामदास धुळगंड, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजने, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, विलास शिंदे, ॲड. बाबासाहेब गायकर, बाजार समितीचे संचालक कैलास पानसरे, रवींद्र भोकनळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कारखाना आणि सहकारी संस्था कार्यरत आहेत. अत्यंत काळजीपूर्वक आणि काटकसरीने कारखान्याचे कामकाज सुरू असून, शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे योग्य नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्व शेतकऱ्यांनी जून महिन्यात ऊस लागवड केल्यास तोडणीच्या वेळी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कमी पाणी, कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे आजच्या शेतीचे सूत्र असले पाहिजे. जमिनीतील सेंद्रिय द्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी कारखान्याच्या कृषी विभागाच्या मदतीने सेंद्रिय द्रव्यांचा वापर करावा लागेल. ऊस शेती निष्काळजीपणे न करता अधिक काळजीपूर्वक केल्यास एकरी उत्पादन नक्कीच वाढेल.

थोरात कारखान्यावर तालुक्यातील आणि बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असल्याने कारखान्याचे गाळप सातत्याने चांगले होत असते. कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन झाल्याने उपपदार्थांची निर्मिती जास्त होऊन त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.
ऊस विशेषज्ञ सुरेश माने म्हणाले की, शेतीत जास्त पाण्यापेक्षा पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करा. मे आणि जून महिन्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी असलेल्या विविध पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. उसाची व्हरायटी, लागवड पद्धत, खते आणि फवारणी याबाबत शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पिंपरणे, शेडगाव, शिबलापुर आणि पानोडी येथेही ऊस विकास मेळावा संपन्न झाला. स्वागत ॲड. नानासाहेब शिंदे यांनी केले. प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी तर पांडुरंग पाटील घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.


