
पुणे –
‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेतील त्रुटींची कबुली दिली. “लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
पवार यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हानेही स्पष्ट केली. लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले. या योजनेसाठी मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिला पात्र होत्या. मात्र, अपात्र महिलांनीही अर्ज केल्याचे समोर आले आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू असून, गरजू आणि पात्र महिलांनाच यापुढे लाभ दिला जाईल. अपात्र महिलांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या विषयावर बोलणे त्यांनी टाळले. यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेतील पारदर्शकतेवर शासनाचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात या योजनेचा लाभ केवळ खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांनाच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


