संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आता अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मासिक सभा आणि ग्रामसभांमधील अनियमिततेसह एप्रिल २०२२ ते मार्च २०२५ या काळातील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामांमध्ये वस्तू खरेदीतील गैरव्यवहारांबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र जनआंदोलन व उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाले आहेत. २०२२-२३ या वर्षात तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सुमारे रु. ८.५३ लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. यात बाकडे खरेदीसाठी रु. ४,१३,०००, मेडीक्लोर औषध खरेदीसाठी रु. २,४३,००० आणि औषध फवारणी व इतर औषध खरेदीसाठी रु. १,९६,००० च्या बोगस बिलांचा समावेश आहे.
तसेच, २०२४-२५ या आर्थिक वर्षात (१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून) विद्यमान सरपंच प्रीती गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने लाखो रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे. यामध्ये महिला सबलीकरणाच्या नावाखाली रु. ४,१२,५६० च्या शिलाई मशीन खरेदी आणि रु. २,९९,००० च्या कचराकुंडी खरेदीतील गैरव्यवहारांचा समावेश आहे. ‘नल-जलमित्र’ योजनेतही अनियमितता झाल्याचा आरोप आहे, जिथे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर ४९,५०० रुपये वळते करण्यात आले.
या संदर्भात ग्रामस्थांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार करूनही दोन महिन्यांहून अधिक काळ चौकशी झाली नसल्याचे म्हटले आहे. माहिती विचारली असता, टाळाटाळ करण्यात आल्याचा अनुभव ग्रामस्थांनी सांगितला. ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांनाही दिशाभूल करणारी उत्तरे देऊन ग्रामसभेची दिशाभूल केल्याचा व राजकीय दबावामुळे दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माजी उपसरपंच गोकुळ दिघे आणि विद्यमान सरपंच प्रीती दिघे, तसेच ग्रामविकास अधिकारी पवार यांनी जोर्वे ग्रामपंचायतीचे अक्षरशः लचके तोडले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संबंधित व्यक्तींकडून धमकावणे, मारामारी, दमदाटी आणि शिवीगाळ असे प्रकार सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाला सात दिवसांच्या आत या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची अंतिम मुदत दिली आहे. अन्यथा, विद्यमान जोर्वे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ पंचायत समिती समोर तीव्र जनआंदोलन आणि उपोषण करतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. गैरव्यवहारात नाव समोर आलेले आजी-माजी सरपंच हे नात्याने पती पत्नी असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे समर्थक आहेत.
उपसरपंच बादशाह बोरकर, सदस्य दिगंबर इंगळे, किसन खैरे, हौशिराम दिघे, संदीप काकड, संगीता थोरात, सुनीता दिघे, पूनम खैरे, मंगल काकड, जगन्नाथ दिघे, मुकेश काकड, बाबासाहेब बोरकर, सोपान कांदळकर, संजय थोरात, शेख हमीद, वसंत बोरकर, संतोष जाधव, कैलास इंगळे, सुनील थोरात, भाऊसाहेब दिघे, राहुल बोरकर, सुनील दिघे, भाऊराव बोरकर, विठ्ठल काकड, दत्तात्रय काकड, रावसाहेब काकड, संपत थोरात, राजेंद्र बलसाने, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, प्रशांत गायकवाड, डॉ. प्रवीण काकड, रमेश दिघे, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, सत्यजित थोरात, विठ्ठल काकड, दत्तु नाना काकड, वसंत बोरकर, राहुल बोरकर आदी ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थित होते.


