मुंबई, ४ जून २०२५:
भाजप महायुतीचं सरकार जनतेच्या हिताऐवजी अदानी समूहाच्या फायद्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानींना दिल्या गेल्या असून, आता फक्त मंत्रालय आणि विधिमंडळच त्यांना देणं बाकी आहे का, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबईतील दोन्ही विमानतळे, धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डंपिंग ग्राऊंडची जमीन, कुर्ल्यातील ८.५ हेक्टर मदर डेअरीची जमीन आणि वांद्रे येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही अदानींना देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी अदानींच्या घशात घालून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात, मदर डेअरीची जमीन अदानींना देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणीही सपकाळ यांनी केली.
सपकाळ यांनी पुढे बोलताना सांगितलं की, एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना मदत करण्यासाठी, ‘लाडकी बहीण’ योजनेतून भगिनींना पैसे देण्यासाठी किंवा शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत; पण अदानींना मात्र तत्परतेने मदत केली जात आहे.
गृहविभागाने प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकर संदर्भात काढलेल्या परिपत्रकावरही सपकाळ यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, हे सरकार राज्यात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे जाणूनबुजून उकरून काढत आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत निर्देश दिले असतानाही, राज्य सरकारने वेगळा ‘फतवा’ काढून आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. हा ‘फतवा’ तात्काळ मागे घेण्याची मागणी सपकाळ यांनी केली.

यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेश कार्याध्यक्ष आणि CWC सदस्य नसीम खान यांनी सांगितलं की, भाजप-महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच भोंग्यांचा ‘फतवा’ काढला आहे. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही गृहविभागाने अशाप्रकारे ‘फतवा’ काढणं निषेधार्ह आहे. सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी खान यांनी केली.
काँग्रेस नेते घेणार अवकाळीग्रस्त शेतीची पाहणी, राज्यपालांची भेट – राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेतीच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर राज्यपाल महोदयांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचंही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष, सीडब्ल्यूसी सदस्य नसीम खान आणि प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील उपस्थित होते.


