
मुंबई, दि. ९:
गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अजूनही रुसला असून, किमान १५ जूनपर्यंत तरी महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची शक्यता नाही. त्यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीचा अपवाद वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची लाट! – या काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये तो ४० अंशांवरच राहील. मराठवाडा आणि खानदेशातही अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

तुरळक पावसाची शक्यता, पण मान्सून नाही– १४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. काही ठिकाणी, विशेषतः दुपारनंतर मेघगर्जनेसह तुरळक सरी कोसळू शकतात. या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात याची शक्यता अधिक आहे, तर इतर भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल.
शेतकऱ्यांनो, पेरणीसाठी घाई करू नका!- वाढलेले तापमान आणि मान्सूनच्या विलंबामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना, विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्यांना, पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा.


