संगमनेर, प्रतिनिधी –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी ‘मॅच फिक्सिंग’ केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेला नसून, तो भाजपसाठी काम करत असल्याचा थेट दावा थोरात यांनी केला आहे. सत्तेसाठी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्फोटक विधान केले आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी या मुलाखतीत सांगितले की, लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाला अनेकदा प्रश्न विचारले आहेत. मात्र, अद्यापही निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काही मंत्री उत्तरे देत असले तरी, ही उत्तरे देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
थोरात यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक संशयास्पद बाबींवर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण होते. तरीही वाढलेले मतदार, मतदानाच्या शेवटच्या तासात अचानक वाढलेला टक्का आणि भाजपचा १४९ पैकी १३२ जागांवर विजय, म्हणजेच मोठा स्ट्राईक रेट संशयास्पद वाटतो, असे त्यांनी म्हटले. जनतेच्या मनात आजही ईव्हीएमबद्दल शंका आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले, मतदार इतके कसे वाढले, तर काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार नोंदणी कशी झाली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विशेषतः, शेवटच्या तासात अचानक सहा लाख मतदान कसे वाढले, हे कोडे आहे असे थोरात म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका वसतिगृहात ७००० मतदारांची नोंदणी झाल्याचा आणि त्यांना निवडणूक ओळखपत्रेही मिळाल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी निदर्शनास आणून दिला. भाजप आणि मित्रपक्ष जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग स्वायत्त असणे अपेक्षित असताना, तो आता भाजपसाठी काम करत असल्याचा पुनरुच्चार थोरात यांनी केला.

व्हीव्हीपॅट स्लिप्स नाकारल्याने संशय वाढला – निवडणूक निकालानंतर व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स मिळायला हव्या होत्या, परंतु निवडणूक आयोगाने त्या नाकारल्या, ही बाबही संशयास्पद आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे १५७ उमेदवार विजयी होतील, अशी खात्री होती, मात्र मतदार वाढवण्याचे त्यांचे पूर्वनियोजित राजकारण होते, असे म्हणत अनैतिक राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
खासदार राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत आणि निवडणूक आयोगाऐवजी दुसरेच लोक उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ केली असल्याचा आरोप करताना, देशाची लोकशाही आणि राज्यघटना टिकली पाहिजे, यासाठी आपला लढा सुरू राहील, असे थोरात यांनी नमूद केले.
संगमनेरच्या निकालावरही प्रश्नचिन्ह – महाराष्ट्र काँग्रेसमधील एक वरिष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून ते सलग आठवेळा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी संगमनेर मतदारसंघ हा अत्यंत खात्रीचा आणि विश्वासाचा मानला जात होता. थोरात यांचा विजय निश्चित मानला जात असताना, अनपेक्षित निकाल लागल्याने संगमनेरचा निकाल हा राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला. ‘असे कसे होऊ शकते?’ हा मोठा प्रश्न राज्यात उपस्थित झाला. अत्यंत अभ्यासू, शांत, संयमी आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या या वक्तव्यावर देशात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.



