संगमनेर, प्रतिनिधी:
स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेले दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यंदाच्या वृक्षारोपण अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात झालेल्या १९ व्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी, बाबुराव गवांदे, अनिल थोरात, सतीश गुंजाळ, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे, मधुकर गुंजाळ यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे अधिकारी आणि दंडकारण्य समितीचे सदस्य उपस्थित होते.
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आणि वृक्षांचे महत्त्व
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतूचक्रात झालेल्या बदलांवर चिंता व्यक्त केली. वाढती उष्णता आणि हवामानातील बदल हे सजीवसृष्टीसाठी धोकादायक असून, कोरोना संकटात ऑक्सिजनची कमतरता जगाने अनुभवली आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष अत्यंत महत्त्वाचे असल्याने, सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन हे आपले मूलभूत कर्तव्य मानले पाहिजे, असे ते म्हणाले. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सहकार्यातून यावर्षीही तालुक्यातील विविध डोंगर आणि गावातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
संगमनेरमध्ये वाढलेली वृक्ष संवर्धन संस्कृती
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले. प्रत्येकाला वृक्षांचे महत्त्व पटले आहे. कारखान्याजवळील एटीपीचा डोंगर, खांडगाव कपालेश्वर, कोळवाडे येथील हरमन हिल, मोरया डोंगर, पिंपळगाव कोंझिरा कनकेश्वर, हिवरगाव पावसा येथील देवगड, कऱ्हे घाट, चंदनापुरी घाट, पेमगिरी शहागड यांसारख्या विविध ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून झालेल्या वृक्षसंवर्धनामुळे हा परिसर हिरवागार दिसू लागला आहे, असे त्यांनी नमूद केले. याचबरोबर, मालपाणी उद्योग समूहाने खांडगाव येथे आणि स्वदेश उद्योग समूहाने धांदरफळ येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले आहे. या लोकचळवळीत नागरिकांच्या सक्रिय सहभागासोबतच वनविभाग आणि विविध सेवाभावी संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे सांगत यावर्षीही सर्वांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले, तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अमृत उद्योग समूह, विविध सेवाभावी संस्था आणि दंडकारण्य अभियान समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



