अकोले, २३ जून- प्रतिनिधी
समाजासाठी दिशादर्शक ठरणारी मदत ही एक उत्कट आणि आध्यात्मिक समाधान देणारी बाब आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालय, सहसचिव विजय चौधरी यांनी केले.

रविवारी (दि. २२) अकोले येथील अगस्ती मंदिरात आयोजित गुरुकुलच्या ५४ हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोडगे परिवाराकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी व्यासपीठावर अगस्ती देवस्थान ट्रस्ट समितीचे खजिनदार किसनशेठ लहामगे, विश्वस्त रामनाथ मुर्तडक, राधाकृष्ण आरोटे, वनवासी कल्याण आश्रमाचे रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरच्या प्रा. मंगल गोडगे, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, मंदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवोदय विद्यालयात निवड झालेल्या आराध्य भोर या विद्यार्थ्यास विजय चौधरी यांच्या हस्ते परदेशी बनावटीचे घड्याळ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सहसचिव चौधरी यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो, तेव्हा परिस्थिती खूप बिकट होती. पावसाळ्यात छत्रीऐवजी घोंगडी आणि शालेय दप्तरासाठी गोणीची पिशवी वापरावी लागायची. पायात चपलाही नसायच्या.” आजही संघर्ष असला तरी भौतिक सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले. वेगवान इंटरनेटमुळे माहितीचा खजिना उपलब्ध झाला आहे आणि शिक्षणामध्ये मोठे बदल होत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि सोपे होत आहे. मात्र, या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विचलित न होता, इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा असे आवाहन त्यांनी केले. जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान असेल तरच जीवन स्थिर होते, यासाठी अगस्ती देवस्थान संचलित गुरुकुल आश्रम एक दिशादर्शक ठरेल. स्व. शेषराव गोडगे यांच्या नावाने होतकरू विद्यार्थ्यांना दिलेली ही मदत समाजासाठी एक अनुकरणीय आणि प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आदित्य गोडगे यांनी या उपक्रमामागील हेतू स्पष्ट केला. तर वृषाली कडलग यांनी आपल्या मनोगतात, गरजू विद्यार्थ्यांना योग्य वेळी मिळालेली ही मदत त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असे नमूद केले.

रामदास सोनवणे यांनी आपल्या भाषणात सहसचिव विजय चौधरी यांच्या यशोगाथेचा उल्लेख करत, प्रवाहाविरुद्ध संघर्ष करणारे व्यक्तिमत्वच इतिहास घडवतात असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोकुळ आरोटे, अमित नाईकवाडी, आदित्य कडलग, धनश्री आरोटे, ऋतुजा आरोटे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त रामनाथ मुर्तडक यांनी केले, तर गोकुळ आरोटे यांनी आभार प्रदर्शन केले.

