संगमनेर, प्रतिनिधी:
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या कथित विधानांवरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वादात आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी उडी घेतली असून, त्यांनी अबू आझमींना थेट इशारा देत वारी ही महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
आ. खताळ यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक सविस्तर ट्विट करत आझमी यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
https://x.com/amolkhatalpatil/status/1937066759900839949?t=r1JBwjRagfUHXyT3UM6lFg&s=19

आ. खताळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पावसाची सर झेलत, पायी चालत असतात.” वारीमधील शिस्तीचे दाखले देत त्यांनी लिहिले की, “ट्रॅफिक जॅम सोडा, एक ॲम्ब्युलन्स जरी आली तरी लाखो वारकरी एका मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सला जायला वाट मोकळी करून देतात…ही आमची परंपरा आहे.” या विधानांतून खताळ यांनी वारीची पावित्र्य, शिस्त आणि सामाजिक भान अधोरेखित केले.
अबू आझमींना थेट उद्देशून खताळ यांनी म्हटले आहे, तुला त्रास होतोय तर मग तुझी बॅग भर, तिकीट काढ आणि परत जा. परराज्यातून आलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्राच्या परंपरांवर भाष्य करण्याच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, खताळ यांनी पुढे लिहिले, बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या तुमच्यासारख्या भैय्यांना आमच्या ‘वारी’वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि लक्षात ठेव, आम्ही हे खपवून घेणार नाही.

या इशाऱ्यात आ. खताळ यांनी महाराष्ट्राच्या संयमी स्वभावाचा उल्लेख करत, वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यासही महाराष्ट्र मागे हटणार नाही, असे सूचित केले. त्यांनी आपल्या ट्विटचा समारोप करताना म्हटले आहे, “महाराष्ट्र सहनशील आहे, पण शिवरायांचं रक्तही आमच्यात आहे, हे विसरू नकोस!” छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत, त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि बाणा स्पष्ट केला.
खताळ यांच्या ट्विटमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र झाल्याचे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांवर होणारे भाष्य आणि त्यावरील प्रतिक्रिया यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळातही या ट्विटची चांगलीच चर्चा सुरू आहे.


