महाराष्ट्र संवाद न्यूज
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे १२०० फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासातून दोघांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. या घटनेमुळे दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मृत व्यक्तींची नावे रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि महाविद्यालयीन तरुणी रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी असून पारधी हे अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते आणि त्यांच्या पत्नीने अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तसेच, रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ एक पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या. यामुळे संशय आणखी बळावला. रविवारी (२२ जून) रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. काल (सोमवार, २३ जून) सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोध घेतला असता, रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


